Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यालयी निवासस्थाने द्या; अन्यथा मुख्यालय राहण्याची सक्ती करू नका – शिक्षक समन्वय समितीची मागणी



खुलताबाद,जि.छ. संभाजीनगर (10 जुन 2026)

 जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या प्रांगणात दि. 10 जून रोजी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत शिक्षक समिती,शिक्षक सेना,शिक्षक भारती,जुनी हक्क पेन्शन संघटना,शिक्षक परिषद, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, मुख्याध्यापक महासंघ, शिक्षक संघ,उर्दू शिक्षक संघटना,मुक्ता शिक्षक संघटना,खाजगी शिक्षक संघ,पदवीधर शिक्षक संघटना आदी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीस आमदार विक्रम काळे,शिक्षक समन्वय समितीचे मुख्य समन्वयक विजय साळकर,डी.पी. जाधव,दीपक पवार,महेंद्र बारवाल,शिवराम मस्के, सचिन वाहक,शिवराज मोहिते,एम.एम.खुटे,नितीन पवार,देविदास सांगळे, दिलीप गोरे,नितीन नवले, रमेश जाधव,गोविंद उगले, भीमराव मुंडे सतीश कोळी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


अलीकडेच शिक्षण विभागाने मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी माहिती संकलित करण्याचे निर्देश दिल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांना शासनाकडून मुख्यालयी राहण्यासाठी कोणतीही निवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसताना मुख्यालयी राहण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे सर्व संघटनांनी एकमुखाने स्पष्ट केले.

यानंतर शिक्षक समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.यावेळी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण,आमदार विक्रम काळे,विजय साळकर,डी. पी.जाधव,दीपक पवार, एम. एम. खुटे,महेंद्र बारवाल, गोविंद उगले,भीमराव मुंडे, शिवराज मोहिते,शिवराम मस्के,देविदास सांगळे, नितीन पवार,नितीन नवले, सतीश कोळी आदी उपस्थित होते.

चर्चेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांसाठी मुख्यालयी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. तसेच संबंधित गावांमध्ये उपलब्ध शासकीय निवासस्थानांची पडताळणी करण्यात येईल व तोपर्यंत मुख्यालयाच्या कारणावरून कोणत्याही शिक्षकावर कारवाई केली जाणार नसल्याचे आश्वासन दिले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहावे, शाळा वेळेच्या 15 मिनिटे अगोदर सुरू करून 15 मिनिटे अधिक वेळ अध्यापनासाठी द्यावा, असे आवाहन केले.


बैठकीत शिक्षक समन्वय समितीने पुढील प्रमुख मागण्या मांडल्या :

शिक्षकांसाठी मुख्यालयी सुरक्षित व सुसज्ज निवासस्थाने बांधण्यात यावीत.

• निवासस्थाने उपलब्ध होईपर्यंत मुख्यालयी राहण्याची सक्ती करू नये.

• गणवेश योजनेसाठी 100 टक्के निधी उपलब्ध करून द्यावा.

• जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चर ऑडिट करून आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

• गणवेशासाठी अपुरा निधी देऊन मुख्याध्यापकांवर खरेदीची जबाबदारी टाकू नये.

• संपूर्ण निधी उपलब्ध झाल्यानंतरच जबाबदारी निश्चित करावी.

समितीने इशारा दिला की, शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील शिक्षक प्रभारी पदांचे कार्यभार सोडतील, शासकीय व्हॉट्सअॅप गटांमधून बाहेर पडतील आणि सर्व शिक्षक संघटना संयुक्तपणे असहकार आंदोलन छेडतील.

प्रतिक्रिया

"शिक्षकांना मूलभूत सुविधा न देता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणे योग्य नाही. शासनाने वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि शिक्षण व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात."

आमदार विक्रम काळे


"शिक्षकांना मुख्यालयी राहूनच अध्यापन करायचे आहे, ही शिक्षक समन्वय समितीची अनेक दिवसांची भूमिका आहे. मात्र मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यापूर्वी शासनाने सुरक्षित व सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नांची तातडीने सोडवणूक झाली नाही तर सर्व संघटनांच्या वतीने जिल्हाभर असहकार आंदोलन करण्यात येईल."

विजय साळकर,मुख्यसमन्वयक शिक्षक समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगर

Post a Comment

0 Comments