खुलताबाद, दि. 11 जून 2026 : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शासनाच्या ऑनलाईन खत विक्री प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत बाजारसावंगीचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण साहेबराव गायकवाड यांनी खुलताबादच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले. तालुक्यात तातडीने ऑनलाईन खत विक्री बंद करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने खत उपलब्ध करून द्यावे, अशी त्यांनी मागणी केली.
निवेदनात त्यांनी नमूद केले की, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने किंवा नोंदणीकृत मोबाईलवर OTP न मिळाल्याने खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तसेच संबंधित संकेतस्थळ व अॅपमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने व्यवहार रखडत आहेत. ग्रामीण भागातील इंटरनेट व नेटवर्क समस्येमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
याशिवाय खरीप हंगामाच्या तोंडावर खताचा वेळेवर पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मृग नक्षत्र सुरू होऊन चार ते पाच दिवस उलटले असून पाऊस कधीही सुरू होऊ शकतो. अशा परिस्थितीत वेळेत खत उपलब्ध न झाल्यास पेरणीवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची तसेच कृषी उत्पादनावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून तालुक्यात तात्काळ ऑफलाईन खत विक्री व्यवस्था सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही अरुण गायकवाड यांनी दिला. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर, तालुका कृषी अधिकारी, खुलताबाद तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून निवेदनावर अरुण गायकवाड यांच्यासह कलीम पठाण आणि विरेंद्र वाघ यांच्या सह्या आहेत.

0 Comments