खुलताबाद, २६ जुन २०२६ : खुलताबाद तालुक्यातील खांडीपिंपळगाव ते खिरनीखोरा या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, प्रशासनाने २४ मे रोजी अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा केला. त्यामुळे परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी जाणे, शेतीमालाची वाहतूक करणे तसेच नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्ता पूर्ववत सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत महसूल प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही पूर्ण केली.या कारवाईदरम्यान नायब तहसीलदार सुभाष पांढरे, मंडळ अधिकारी कावळे मॅडम, ग्राम महसूल अधिकारी दत्तू शेलार, बिट जमादार मुळे, फिरोज पठाण, राम टेके, पोलीस पाटील जनार्धन उबाळे तसेच माजी सरपंच कारभारी महालकर उपस्थित होते.
दरम्यान, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष भागचंद जोनवाळ आणि शेतकरी मानसिंग जोनवाळ यांनी सातत्याने प्रशासनाशी पाठपुरावा करून अथक प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनासह सर्व संबंधितांचे आभार मानले.
रस्ता मोकळा झाल्यामुळे खांडीपिंपळगाव–खिरनीखोरा परिसरातील शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची ये-जा आता अधिक सुलभ होणार असून, शेतीमालाच्या वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.


0 Comments