खुलताबाद, 03 ऑगस्ट 2026 : राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग देविदास जाधव यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच आमदार प्रशांत बंब यांचे शेतकरी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत. कर्जमाफीसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आल्याने पात्र शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असल्याने कोणताही शेतकरी या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, असे जाधव यांनी सांगितले. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा असून त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय खुलताबाद तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई, शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक करणे तसेच घरकुल योजनांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्यासारखे जनहिताचे निर्णयही आमदार प्रशांत बंब यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागत असल्याचे जाधव यांनी सांगितले. या निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी पांडुरंग जाधव यांनी कर्तव्यदक्ष आमदार प्रशांत बंब यांनी शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून अनेक महत्त्वाचे निर्णय शासन स्तरावर मंजूर करून घेतल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी ते कटिबद्ध राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच खुलताबादचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे मार्गी लागत असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचेही जाधव यांनी कौतुक केले. शासनाच्या शेतकरीहिताच्या निर्णयांमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अशाच लोकहिताच्या योजना पुढेही प्रभावीपणे राबविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

0 Comments