मुंबई: "निवडणुकीत पडलाय पाऊस, आता बदलायची आहे हाऊस!" जोगेश्वरीच्या राजकारणात सध्या हीच हवा वाहत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर इथल्या राजकीय मैदानात शांतता असली, तरी पडद्यामागे मात्र एका मोठ्या भूकंपाची तयारी सुरू झाली आहे. शिंदे गटाचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर सावंत यांच्या खुर्चीला 'कात्री' लागणार का? त्या जागेवर कोण बसणार? या प्रश्नांनी जोगेश्वरीचे राजकारण तापले आहे.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बालेकिल्ल्यातच आता त्यांच्या प्रभावाला ओहोटी लागल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. निसटता विजय आणि त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना स्वीकारावा लागलेला पराभव, ही खासदार वायकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळेच आता संघटनेची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी 'खांदेपालट' अटळ असल्याचे बोलले जात आहे.
विभागप्रमुख पदाच्या या 'म्युजिकल चेअर'मध्ये प्रकाश उर्फ बंड्या शिंदे यांचे नाव सध्या जोरात चर्चेत आहे. कार्यकर्त्यांची फौज आणि वरिष्ठांचा वरदहस्त या जोरावर त्यांनी आपली दावेदारी भक्कम केली आहे. पण थांबा! ही शर्यत सोपी नाही. मैदानात आणखी दोन तगडे खेळाडू आहेत:
- निखिल शिंदे: ज्यांच्या नावामागे वारसा आणि तरुणांची मोठी फळी आहे.
- राहुल महाले: खासदार वायकरांचे जावई, ज्यांच्या नावामुळे ही लढाई आता 'घराणेशाही' विरुद्ध 'कार्यकर्ता' अशा वळणावर येऊन ठेपली आहे.
जोगेश्वरीचा हा राजकीय पेच आता एका वळणावर येऊन थांबला आहे. कार्यकर्त्यांचा आवाज ऐकला जाणार की पुन्हा एकदा 'निकटवर्तीय'च बाजी मारणार? बंड्या शिंदेंचा राज्याभिषेक होणार की एखादा अनपेक्षित चेहरा बाजी मारून जाणार? या प्रश्नांचे उत्तर लवकरच जोगेश्वरीच्या राजकारणाची नवी दिशा ठरवेल.
0 Comments