खुलताबाद, जि. छसंभाजीनगर (16 जुन 2026)
खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव ते खिरणी खोरा (जोनवाळ) वस्तीपर्यंत जाणारा शेतरस्ता अतिक्रमण, वाढलेली झाडीझुडपे आणि खराब अवस्थेमुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून हा रस्ता मोकळा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
सदर रस्ता जोनवाळ वस्तीवरील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा, शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतूक, शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची ने-आण तसेच पाळीव जनावरांची वाहतूक यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, अनेक ठिकाणी अतिक्रमण आणि झाडीझुडपांमुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. रस्त्यावरून वाहन चालविणे तसेच पायी प्रवास करणेही धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत भाजपचे उपतालुकाध्यक्ष भागचंद जोनवाळ आणि मानसिंग जोनवाळ यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. “ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला हा महत्त्वाचा रस्ता तातडीने मोकळा करणे आवश्यक आहे. प्रशासनाने विलंब न करता आवश्यक कार्यवाही करून शेतकरी व ग्रामस्थांची समस्या सोडवावी,” अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनीही महसूल विभाग व संबंधित प्रशासनाने त्वरित दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पावसाळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.

0 Comments