खुलताबाद (प्रतिनिधी) :- वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत असून, प्रकरण दाबण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप स्वराज्य सेनाच्या संस्थापक अध्यक्षा करुणा मुंडे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून बोरसे कुटुंबीयांना न्याय देण्याची तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
सोमवारी (ता.15) रोजी करुणा मुंडे यांनी बोरसे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका शिक्षकाचा भरदिवसा मारहाणीत मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असून, अशा घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचा दावा करत त्यांनी तपास पारदर्शक व निष्पक्ष पद्धतीने होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच या प्रकरणातील सर्व संबंधित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
"कायद्यापुढे सर्वजण समान आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तपास यंत्रणांनी सत्य बाहेर आणावे. दोषींना कठोर शिक्षा मिळाल्यासच बोरसे कुटुंबीयांना न्याय मिळेल आणि नागरिकांचा कायद्यावरील विश्वास कायम राहील," असे करुणा मुंडे यांनी म्हटले.
दरम्यान, सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


0 Comments