संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, भारत २४ तास)
शत्रूच्या गोळ्यांचा मारा सुरू असतानाही… तो मागे हटला नाही.
आईच्या कुशीतून देशाच्या मातीला गवसणी घालणारा शूरवीर…
तो लढला, शेवटच्या श्वासापर्यंत लढला…
आणि अखेर देशासाठी प्राण अर्पण करून वीरगतीला प्राप्त झाला.
भारत-पाकिस्तान सीमारेषेवर पुन्हा एकदा तणावाचं वातावरण तयार झालं आहे. काश्मीरच्या पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्यातील दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत. त्यापैकी एक होते – मुंबईच्या घाटकोपरमधील मुरली नाईक.
कामराज नगरच्या झोपडपट्टीत वाढलेला, आणि नंतर देशासाठी झटणारा, हा जवान आज आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी शहीद झाला. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास झाला आणि कुटुंब सध्या मूळगावी – आंध्र प्रदेशात राहत आहे. पण त्यांचे मुळं आजही मुंबईच्या मातीत खोलवर आहेत.
९ मेच्या पहाटे ३ वाजता भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत, मुरली नाईक यांनी पाकिस्तानच्या घुसखोरांना खडसावलं. पण दुर्दैवाने, शत्रूच्या गोळीबारात ते जखमी झाले आणि वीरगतीला प्राप्त झाले.
घाटकोपरच्या १३३ नंबर प्रभागात त्यांच्या शौर्याचे बॅनर लावण्यात आलेत. स्थानिक नागरिकांनी अश्रूभऱ्या नजरेतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीसुद्धा मुरली नाईक यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, पीडीपीच्या नेत्या महबुबा मुफ्ती यांनी युद्ध थांबवण्याचं आवाहन करताना अश्रूंनी भरलेल्या शब्दांत विचार व्यक्त केलेत — "किती काळ आपल्या मातांना अश्रू ढाळावे लागणार?"
आज देशासाठी प्राण अर्पण करणारा मुरली नाईक, आपल्या सर्वांच्या मनात अमर राहील. शत्रूच्या गोळ्यांना सामोरे जाताना शहीद होणं — हाच तर खरा पराक्रम असतो.
0 Comments