खुलताबाद, 17 जुलै 2026 : राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कृषी वीज ग्राहकांच्या जुन्या थकीत वीज बिलाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारक शेतकऱ्यांची तब्बल ₹४८ हजार कोटींची जुनी वीज थकबाकी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ४३ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असून शेतकरी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेद्वारे ७.५ एचपीपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या नावावर मागील अनेक वर्षांपासून वीज बिलाची मोठी थकबाकी होती. या थकबाकीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. नव्या निर्णयामुळे ही थकबाकी माफ होणार असल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
याशिवाय, पुढील पाच वर्षांत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर २४ तास पाणी आणि १२ तास दर्जेदार वीज उपलब्ध करून देण्याच्या दिशेने सरकार प्रयत्नशील असल्याचेही सांगितले जात आहे. सिंचन आणि वीज उपलब्धतेमुळे शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निर्णयाचे स्वागत करत खुलताबाद तालुक्यातील ममनापुर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी पांडुरंग जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. "शेतकरी हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा कणा आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल. बळीराजा नव्या उमेदीने शेतीकडे वळेल आणि राज्याच्या विकासात अधिक योगदान देईल," असे त्यांनी सांगितले.
पांडुरंग जाधव यांनी खुलताबाद तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय सातत्याने घेत राहावेत आणि शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अशाच कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

0 Comments