खुलताबाद, १२ जुलै २०२६ - शेतकरी व सरपंच मंगेश साबळे पाटील यांच्या अटकेचा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग जाधव यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "सत्याचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीला अटक करणे योग्य नाही," असा आरोप त्यांनी केला. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, "ही अटक नसून अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. सत्याच्या लढ्यात आमचा संपूर्ण पाठिंबा मंगेश साबळे पाटील यांच्या पाठीशी आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी, हा कुठला न्याय?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
लोकशाही व्यवस्थेत अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून, अशा प्रकारे आवाज दाबण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक असल्याचेही जाधव यांनी नमूद केले. न्यायासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहील आणि कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि मंगेश साबळे पाटील यांना न्याय मिळावा, अशी मागणीही पांडुरंग जाधव यांनी केली. अन्यायाविरोधातील लढा यापुढेही अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

0 Comments