खुलताबाद / सलमान फय्याज खान
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद तालुक्यातील श्रीक्षेत्र वेरूळ येथे भाविकांच्या सुरक्षित व सुलभ हालचालीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. या मार्गात अडथळा ठरत असलेल्या १६ दुकानदारांनी प्रशासनाच्या नोटिशीनंतर स्वखर्चाने आपली अतिक्रमणे हटवून सहकार्याची भूमिका घेतली.
वाहनतळापासून थेट श्री घृष्णेश्वर मंदिरापर्यंत भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मुख्य राज्यमार्ग ओलांडताना मोठा धोका पत्करावा लागतो. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता वाढत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सबवेची योजना आखण्यात आली आहे.
२ जूनला नोटिसा जारी
प्रस्तावित मार्गात काही शेड, हॉटेल्स तसेच प्रसाद विक्रीची दुकाने अडथळा ठरत असल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. नियमानुसार राज्यमार्गाच्या मध्यरेषेपासून दोन्ही बाजूंना १५ मीटरपर्यंतची जागा रस्त्याच्या हद्दीत येते. मात्र, अनेक ठिकाणी या मर्यादेचे उल्लंघन करून बांधकामे करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने २ जून रोजी संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावत सात दिवसांच्या आत अतिक्रमणे स्वखर्चाने हटविण्याचे निर्देश दिले होते. अन्यथा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार मुदत संपण्यापूर्वीच १६ दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटवून प्रशासनाला सहकार्य केले.

0 Comments