Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? रोज ६ मृत्यू तरीही रेल्वे सुस्त! लोकसभेत रवींद्र वायकरांचा सरकारला थेट सवाल!

वृत्तांकन: संदिप कसालकर

मुंबईची लोकल म्हणजे मुंबईकरांची जीवनवाहिनी. पण हीच जीवनवाहिनी आता मृत्यूचा सापळा बनत चालली आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात मुंबई उत्तर-पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांनी रेल्वे मंत्र्यांना मुंबईकरांच्या सुरक्षेवरून धारेवर धरले.

खासदार वायकर यांनी जीआरपीच्या (GRP) आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, जानेवारी २०१५ ते मे २०२५ या काळात रेल्वे रुळांवर तब्बल २६ हजार ५४७ प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. मृत्यूचे प्रमाण ७ टक्क्यांनी कमी झाले असले, तरी आजही दररोज सरासरी ६ प्रवाशांचा मृत्यू होत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

वायकर यांनी सरकारला विचारले की, रेल्वेला २ लाख ९३ हजार कोटींचे ऐतिहासिक बजेट दिले असताना, मुंबई लोकलमध्ये 'कवच' (Kavach) ही सुरक्षा प्रणाली कधी लागू होणार?

केवळ 'कवच' प्रणालीच नाही, तर लोकलची गर्दी कमी करण्यासाठी मुंबईत 'डबल डेकर' (Double Decker) लोकल कधी सुरू होणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जोगेश्वरी जंक्शनच्या नूतनीकरणाबद्दल त्यांनी रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले, मात्र प्रवाशांच्या जिवाच्या सुरक्षेचा मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला.

मुंबईकरांच्या दररोजच्या प्रवासाला सुरक्षित करण्यासाठी सरकार आता काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार रवींद्र वायकर यांनी विचारलेल्या या प्रश्नावर रेल्वे मंत्रालय काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.



Post a Comment

0 Comments