संदिप रुक्मिणी विठ्ठल कसालकर (संपादक, भारत २४ तास)
मानखुर्द (मुंबई), १५ मे २०२५:
मानखुर्द येथील नूतन विद्या मंदिर या शिक्षण संस्थेने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महाराष्ट्र मंडळाच्या इ. १० वीच्या परीक्षेत (SSC – फेब्रुवारी/मार्च २०२५) शंभर टक्के निकाल देत आपल्या शाळेचा नावलौकिक अधिकच उजळवला आहे. ही केवळ शाळेची नव्हे, तर संपूर्ण मानखुर्द परिसरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
२०६ विद्यार्थी – १००% यश!
यंदा इ. १० वीच्या परीक्षेसाठी एकूण २०६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले. विशेष म्हणजे यापैकी ७९ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. इतरही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत शाळेच्या गुणवत्तेची छाप पुन्हा एकदा सिद्ध केली.
शाळेचा सुवर्ण महोत्सवी ठसा!
या वर्षी नूतन विद्या मंदिराचा सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे आणि अशा ऐतिहासिक वर्षात मिळवलेलं हे यश शाळेसाठी खूप मोठं आहे. ही केवळ शैक्षणिक संस्था नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असलेली जागा आहे, हे या निकालातून अधोरेखित होते.
मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा मोलाचा वाटा
या यशामागे शाळेचे कुशल मुख्याध्यापक शैलेंद्र कदम यांचं मार्गदर्शन, शिक्षक वर्गाची सातत्यपूर्ण मेहनत आणि पालकांचा विश्वास आहे. शिक्षण संस्था व शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी वेळोवेळी प्रभावी उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांनी देखील पूर्ण समर्पण आणि चिकाटीने अभ्यास करत शाळेच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
संस्थेचे अभिनंदन
या १००% निकालाबद्दल संस्थेचे कार्यावाह राजेंद्र हटवार यांनी मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
0 Comments